अकोल्याला अलर्ट; नद्यांच्या काठावरील गावांना व शहरी भागातील सखल भागातील वस्त्यांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
![Akolyala alert; Vigilance alert for villages on the banks of rivers and residents of low-lying settlements in urban areas](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Akolyala-alert-Vigilance-alert-for-villages-on-the-banks-of-rivers-and-residents-of-low-lying-settlements-in-urban-areas.jpg)
अकोला : भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या संदेशानुसार उद्या २४ जुलैपर्यंत जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत नद्यांच्या काठावरील गावांना व शहरी भागातील सखल भागातील वस्त्यांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदी, नाले, तलाव, बंधारे येथे जलसाठा जमा होत असल्याने त्यामध्ये पोहण्यास जाऊ नये. रस्त्यावरून, पुलावरुन पाणी वाहत असल्यास वाहने नेण्याबाबत दक्षता घ्यावी. तर सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाचे नायब तहसिलदार एस. पी. ढवळे यांनी केले आहे.
मागील काही दिवासांपासून जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शहर व सभोवतालच्या परिसरातील पर्यटनस्थळी नागरिक व पर्यटन प्रेमीची वर्दळ वाढलीय. अशा ठिकाणी जास्त गर्दी झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळ मृद अन् जलसंधारण विभागाच्या अंतर्गत असलेल्या सर्व गाव तलाव, पाझर तलाव, साठवण तलाव, सिंचन तलावाच्या स्थळी जाण्यास प्रवेशबंदी करण्यात आली आहे. अशा स्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न नागरिकांनी करू नये. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील या तलावांवर केली प्रवेशबंदी
अकोला जिल्ह्यातील कोथळी, आखतवाडा, मोयापाणी, वाघा, धानोरा, पाटेकर, दधम, बोरगाव, सिंसा, उदेगाव, कुंभारी, सुकळी, घोंगा, पिंपळशेंडा, कानडी, भिलखेड, चिचपाणी, धारूर, सावरगाव बु, झंडी, हिवरा, कही, पूनौती, वडगाव, पारस, गायगाव, कवळा, व हसनापूर येथील सर्व गाव तलाव, पाझर तलाव, साठवण तलाव, सिंचन तलावाच्या स्थळी पुढील आदेश होईपर्यंत प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे.