TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

अजितदादांनी पुन्हा आमच्यासोबत यावं, भाजपकडून खुली ऑफर

अहमदनगर : विखे पाटील आणि पवार कुटुंबियांत कोणताही वैयक्तिक संघर्ष नाही. आमच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत. त्यातून राजकीय मतभिन्नता आहे, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा भाजपसोबत येण्याचे निमंत्रण दिले. ‘देवेंद्र फडणवीस कणखर आणि डायनॅमिक नेते आहेत, तर अजित पवार शिस्तप्रिय आणि कार्यक्षम आहेत. त्यांनी पुन्हा आमच्यासोबत लवकर येण्याचा निर्णय घ्यावा,’ असेही विखे पाटील म्हणाले.

लोणी इथल्या प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाने विखे पाटील यांच्या आगामी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते. यामध्ये अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी विखे यांची मुलाखत घेतली. त्यामध्ये विखे पाटील यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

विखे-पवार कुटुंबातील संघर्षाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विखे पाटील म्हणाले की, आमच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत. राजकारणात अशी मतभिन्नता असतेच. आम्ही आमच्या वडिलांच्या विचाराने पुढे जात आहोत. असे सांगून एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी घडाळ्याच्या वापरासंबंधीचा किस्सा सांगितला.

‘पुन्हा कधीही हातात घड्याळ बांधले नाही’

ते म्हणाले की , दहावीला असताना माझ्याकडे घड्याळ नव्हते. परीक्षेला जाताना वडिलांनी त्यांच्या हातातील घड्याळ काढून मला दिले. परीक्षा संपल्यावर मी ते घड्याळ परत केले. तेव्हापासून पुन्हा कधीही हातात घड्याळ बांधले नाही. हा माझा निर्णय योग्यच ठरला. त्यांच्या या किस्स्यावर सभागृहात चांगलाच हशा पिकाला. आपला भाजपमध्ये जाण्याचा निर्णय योग्यच होता. त्यामुळे आपल्या राजकीय वाटचालीला कलाटणी मिळाल्याचेही विखे यांनी सांगितले.

घराणेशाही संबंधी विचारलेल्या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, अनेक नेत्यांच्या पुढच्या पिढ्या राजकारणात आल्या आहेत. त्यातील अनेकांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. असे चांगले काम करणार्‍याला विरोध असायचे कारण नाही. पण अशा पद्धतीने राजकारणात आलेले लोक निष्क्रिय असतील तर समाजाचे नुकसान होते. त्यांना विरोध होणे साहजिक आहे. माझा मुलगा डॉ. सुजय याने राजकारणात यावे आणि खासदार व्हावे, ही त्याच्या आजोबांची इच्छा होती. त्यांनीच त्याला राजकीय मार्गदर्शन केले. त्यांच्यामुळेच तो राजकारणात आला, असेही विखे यांनी सांगितले.

‘विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कणखर आणि डायनॅमिक नेते’

इतर नेत्यांबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणाले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कणखर आणि डायनॅमिक नेते आहेत. त्यांनी राज्यात लवकर सरकार आणावे, अशी आपली इच्छा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मितभाषी, संयमी आहेत. मात्र, त्यांनी चुकीचे लोक आपल्यापासून दूर केले पाहिजेत. उपमुख्यमंत्री अजित पवार शिस्तप्रिय आणि कार्यक्षम आहेत. त्यांनी पुन्हा आमच्यासोबत येण्याचा निर्णय घ्यावा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल आपल्याला काहीच बोलायचे नाही आणि कोणताच सल्लाही द्यायचा नाही, असेही विखे पाटील म्हणाले. यापुढील काळात विरोधी पक्ष नेता नव्हे तर मंत्री व्हायला आवडेल असेही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button