४ दिवसाच्या जोरदार पावसाने पूल गेला वाहून; सलग दुसऱ्या वर्षी गावातील वाहतूक बंद
![4 days of heavy rain washed away the bridge; Traffic in the village closed for the second year in a row](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/4-days-of-heavy-rain-washed-away-the-bridge-Traffic-in-the-village-closed-for-the-second-year-in-a-row.png)
- कोल्हापूर शहरात पावसाचा जोर वाढला
- शाहूवाडी तालुक्यातील भाताडीच्या ओढ्यावरील पूल गेला वाहून
- प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा सरपंच आणि गावकऱ्यांचा आरोप
२०१९ साली आलेल्या महापुरामध्ये या पुलावर असलेला भराव पूर्णपणे वाहून गेला होता. परंतु यानंतर सार्वजनिक रस्ते बांधकाम विभागाकडून कोणताही ठोस उपाय न केल्यामुळे बुरंबाळ गावचे सरपंच अशोक बारस्कर व उपसरपंच मारूती पाटील यांनी स्वनिधीतून खर्च करून या पुलावर भराव टाकून वाहतूक सुरळीत केली होती. मात्र, आता पुन्हा हा भराव वाहून गेल्याने गावची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. गावामध्ये येण्यास आणि बाहेर जाण्यास हाच एकमेव रस्ता आहे आणि हा एकमेव पूल वाहून गेल्याने शाळकरी विद्यार्थी व दैनंदिन दूध वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेले वर्षभर पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर पाठपुरावा करूनसुद्धा अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडून फक्त आश्वासन मिळतात. परंतु पूलाची दुरुस्ती काही होत नाही, असा आरोप बुरंबाळचे सरपंच अशोक बारस्कर यांनी केला आहे. आता लवकरात लवकर हा रस्ता प्रशासनाने दुरुस्त करून गावकऱ्यांना पुन्हा हा रस्ता सुरू करून द्यावा अशी मागणी येथील सरपंच आणि गावकरी करत आहेत.