राज्यातील ‘स्मार्ट सिटी टेंडर’ची चाैकशी केल्यास मुख्यमंत्र्यांना अटक होईल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/8842e205eac59dcdf28317ad07ccc016.jpg)
– राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांचा गंभीर आरोप
– ससंदरत्न पुरस्काराची उडविली खिल्ली, खासदार बारणे लगावला टोला
पिंपरी ( महा ई न्यूज ) – राज्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे विविध शहरात सुरु आहेत. त्या शहरातील प्रत्येक टेंडर प्रक्रियेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हस्तक्षेप करीत आहेत. ते टेंडर कोणाला द्यायचे अन्ं कोणाला द्यायचे नाही, हे मुंबईत बसूनच ठरवितात. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या टेंडरची चाैकशी केल्यास तुमचेच मुख्यमंत्र्यांना अटक होईल, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
यावेळी महापालिका विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापाैर मंगला कदम, नगरसेवक नाना काटे, मयुर कलाटे, शाम लांडे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना अटक होईल, असे उद्गार भाजप प्रदेशाध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे यांनी दि.17 जानेवारीला (गुरुवारी) पिंपरीत काढले. त्याला प्रत्युत्तर देताना वाघेरे-पाटील म्हणाले की, रावसाहेब दानवे यांनी आपली उंची आणि पात्रता पाहून बोलावे, हेच दानवे शेतक-यांना कर्जमाफी देण्यावरुन शिवीगाळ करतात, शेतक-यांना साले म्हणून तुच्छ वागणूक देतात. त्यांनी शेतक-यांनी लायकी काढली, त्यांना शेतकरी रडतात साले म्हणून हिणविले. तसेच दानवे हे काही स्वच्छ धुतल्या तांदळाचे नाहीत. त्यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांची काळजी घ्यावी, असा टोला वाघेरे पाटील यांनी लगावला आहे.
कोण पार्थ पवार, अशी खिल्ली उडविणा-या खासदार श्रीरंग बारणेंचाही त्यांचा समाचार घेतला. त्यावर ते म्हणाले की, एवढ्या मोठ्या ससंदरत्न माणसाने पार्थ पवार कोण हे बोलणे चुकीचे आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांची धास्ती खाल्लानेच बारणे यांनी असे वक्तव्य केलेले आहे. ससंदरत्न पुरस्कार कसा आणि कुठे मिळतो, हे लोकांना चांगलेच माहिती आहे. आम्ही खालची पातळी सोडून बोलत नाही.
दरम्यान, मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाकडून जो उमेदवार दिला जाईल, तो उमेदवार आम्ही जिंकूनच दाखवू, असाही विश्वास वाघेरे पाटील यांनी व्यक्त केला.