…..म्हणून तर आम्ही १०५ आमदार घरी बसवले; संजय राऊतांचा हल्लाबोल
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा भाजपाला टोला लगावला आहे.“काहीही करा मेट्रोची कारशेड कांजूरलाच होणार. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालो आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातली शिवसेना देशात अजिंक्य आहे, म्हणूनच १०५ आमदार आम्ही घरी बसवले. यावेळी त्यांचे १०५ आहेत पुढच्या विधानसभेला शिवसेनेचे १०५ आमदार असतील” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर एकमेकांशी २५ वर्षांहून अधिक काळ युती करणारे हे दोन पक्ष वेगळे झाल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. तीन पक्षांच्या युतीमुळे भाजपाला विरोधात बसावं लागलं.
आता पुन्हा एकदा मेट्रोची कारशेड आणि १०५ आमदारांच्या मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. “शिवसेना महाराष्ट्रात असली तरीही बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालेली ही शिवसेना आहे. त्यामुळेच शिवसेना देशात अजिंक्य आहे. त्यामुळेच आम्ही १०५ आमदार घरी बसवले. आत्ता त्यांचे १०५ आहेत पण पुढच्या वेळेला आमचे १०५ असतील” असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली. एवढंच नाही तर कारशेड कांजूरलाच होणार असाही निर्धार बोलून दाखवला.