महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांचं वादग्रस्त विधान; उत्तर भारताच्या मानसिकतेवर उपस्थित केला सवाल
पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसदेत महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून उत्तर भारतातील जनतेवर निशाणा साधला आहे. पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. लोकसभा आणि सर्व विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवणाऱ्या महिला आरक्षण विधेयकावरील प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, लोकसभेत काँग्रेसचा सदस्य असल्यापासून मी संसदेत या विषयावर बोलत आहे.
उत्तर भारत, संसदेच्या मानसिकतेवर उपस्थित केला प्रश्न
पुणे डॉक्टर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी लोकसभा आणि विधानसभेतील महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून उत्तर भारत आणि संसदेच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण देण्यासाठी उत्तर भारत आणि संसदेची मानसिकता अजूनही अनुकूल नाही, असे शरद पवार म्हणाले. या कार्यक्रमाला पवार आणि त्यांच्या कन्या आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या.
महिला आरक्षणासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करावे
लोकसभा आणि सर्व विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवणाऱ्या महिला आरक्षण विधेयकावरील प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले की, मी लोकसभेत काँग्रेसचे सदस्य असल्यापासून या विषयावर संसदेत बोलत आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करावेत.
पक्षाच्या खासदारांवर उपस्थित केला प्रश्न
संसदेची विशेषत: उत्तर भारताची मानसिकता या विषयावर अनुकूल राहिलेली नाही, मला आठवतं, मी काँग्रेसमध्ये लोकसभेचा खासदार असताना संसदेत महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायचो. माझे भाषण संपल्यावर मी मागे वळून पाहिले तर माझ्या पक्षाचे बहुतेक खासदार उठून निघून गेलेले असायचे. म्हणजे माझ्या पक्षाच्या लोकांनाही ते मान्य करायचे नाही. शरद पवार म्हणाले की, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना जिल्हा परिषद, पंचायत समिती यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षण सुरू केले होते. सुरुवातीला विरोध झाला पण नंतर लोकांनी तो स्वीकारला.