नारायण राणेंना खरा धोका आहे तो…; विनायक राऊतांचा घणाघात
![Rane says, whether the Home Minister resigns or not, the Chief Minister should resign!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Narayan-Rane.jpg)
महाविकास आघाडी सरकारने केलेल्या सुरक्षा कपातीवरून भाजप नेते नारायण राणे यांनी माझ्या जीवाचे काही बरे – वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा दिला होता. आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नारायण राणे यांना खरा धोका त्यांच्या मुलांपासूनच आहे, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे.
राणेंना दहशतवाद्यांपासून धोका नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सक्षम सरकार आहे. केंद्रात त्यांच्या पक्षाचे सरकार आहे. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी राणेंना त्यांच्या दोन मुलांपासून धोका आहे, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.
राणेंच्या दोन्ही मुलांना राजकारणात यशस्वी होण्यासाठी आवश्यक सर्व उपलब्ध होते. पण दोघांनाही त्याचा व्यवस्थित उपयोग करून घेता आला नाही. नीलेश आणि नितेश दोघेही गुंड प्रवृत्तीचे आहेत, अशी जोरदार टीका देखील त्यांनी राणे कुटुंबियावर केली.