‘औरंगाबाद विमानतळाला अजिंठा-वेरूळ लेणीचे नाव द्यावे’, रामदास आठवलेंचे ट्विट
![Ramdas Athawale demands renaming of Aurangabad airport as Ajantha Verul Caves](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/ramdas-athawale-copy.jpg)
सध्या विविध गोष्टींच्या नामांतरण करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. आधी औरंगाबाद शहराचे संभाजीनगर करण्याची मागणी आणि आता औरंगाबाद विमानतळाला अजिंठा वेरूळ लेणीचे नाव द्यावे, अशी नवीन मागणी रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामांतर करावे अशी मागणी शिवसेनेने केली होती. काँग्रेसने याला विरोध दर्शवला आहे. त्यातच औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्राला पत्र पाठवले आहे. मात्र आता रामदास आठवलेंनी नवीन मागणी पुढे केली आहे.
औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे. अजंठा एलोरा या बौद्ध संस्कृती च्या लेणी असून जागतिक वारसा स्थळ तथा 8 जागतिक आश्चर्य स्थळांपैकी एक आहेत. त्यामुळे औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोराचे नाव द्यावे ही रिपाइंची मागणी असल्याचे आठवलेंनी म्हटले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही, असे रामदास आठवले यांनी सांगितले आहे.