विराट कोहली घेणार टी 20 मधूनच ब्रेक? वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली माहिती
पुण्यात होणार भारत वि. श्रीलंका ट्वेंटी 20 सामना
पुणे :
भारत विरूद्ध श्रीलंका आंतरराष्ट्रीय टी-20 सामना जानेवारी महिन्यामध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही संघात प्रत्येकी तीन मॅचेसची टी-20 आणि वन-डे सीरिज खेळवली जाणार आहे. दरम्यान, आज संघाची घोषणा होणार आहे. या मॅचेससाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
विराट आता वनडे आणि कसोटी क्रिकेटवर जास्त लक्ष केंद्रीत करणार आहे. त्यामुळे त्याला टी-20 क्रिकेटमधून विश्रांती दिली जाणार आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. विराटच्या जागी मधल्या फळीत फलंदाज राहुल त्रिपाठीला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राहुल त्रिपाठी अलीकडेच बांगलादेश दौऱ्यावर एकदिवसीय संघात दाखल झाला होता. मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नव्हते.
येत्या पाच जानेवारीला पुण्यातील गहुंजे स्टेडियम येथे हा सामना होणार आहे. या सामन्यासाठीची तिकीट विक्री 27 डिसेंबर पासून सुरु होणार आहे . 22 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता नवीन वर्षात आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामना पुण्यात होणार आहे. भारत विरूद्ध श्रीलंका संघाचा मालिकेतील दुसरा सामना पुण्यामध्ये खेळला जाणार आहे.
पुण्यात यापुर्वी मार्च 2021 मध्ये भारतीय संघाचे इंग्लंड संघाविरुद्ध तीन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. सध्या भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध कसोटी सामने खेळत असून 26 डिसेंबर 2022 या दोघांच्या समारोप होणार आहे. याबाबतची सर्व तयारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडून करण्यात आलेली आहे. क्रिकेट प्रेमी आणि रसिकांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक रोमांचकारी सामना अनुभवायला मिळणार आहे.