जसप्रित बुमराह म्हणजे जगातलं आठवं आश्चर्य; विराटकडून बुमराहचं कौतुक
Team India Victory Parade | भारतीय संघाने १७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर टी-२० विश्वचषक २०२४ ची ट्रॉफी जिंकली आहे. भारताने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. भारतीय क्रिकेट संघाने ४ जुलै रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांसोबत आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ चा विजय शानदार शैलीत साजरा केला. मुंबईत जो विजयी उत्सव साजरा झाला त्या विजय उत्सवात जसप्रित बुमराह म्हणजे जगातलं आठवं आश्चर्य आहे असं विराटने म्हटलं आहे.
विराट कोहली म्हणाला, आज मी अशा व्यक्तीचं कौतुक करतोय ज्याने आम्हाला या खेळात परत आणलं आणि एकदाच नाही तर परत परत जिंकवलं. मी सर्वांना सांगेन की बुमराहसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आम्ही नशीबवान आहोत की आम्ही त्याच्यासह खेळत आहोत. बुमराहसारखा खेळाडू क्वचितच एखाद्या जनरेशनमध्ये दिसतो.
हेही वाचा – ब्रिटनमध्ये सत्ताबदल! भारताचे जावई ऋषी सुनक यांचा पराभव, पुढचा पंतप्रधान कोण होणार?
विराटला यावेळी प्रश्न विचारण्यात आला जसप्रीत बुमराहला राष्ट्रीय संपत्ती जाहीर करावं का? तू सही करशील का? त्यावर विराट एका क्षणाचाही विलंब न करता म्हणाला होय मी सही करायला तयार आहे कारण बुमराह जगातलं आठवं आश्चर्य आहे.
दुसरीकडे, जसप्रीत बुमराहने आपल्या निवृत्तीबाबतही जाहीरपणे भाष्य केलं. माझी निवृत्ती अजून खूप लांब आहे. मी आता कुठे खेळायला सुरुवात केली आहे.हे मैदान खरंच खूप खास आहे. मी लहान असताना इथे आलो होतो आणि आज मी जे पाहिलं, तसं मी यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. भारताने विश्वचषक जिंकल्यानंतरचा क्षण वेगळाच होता. मी सहसा भावुक होणारा नाहीय, पण माझ्या मुलाला पाहून मी सुध्दा भावुक झालो. मी सामन्यानंतर आजपर्यंत कधीच रडलो नाहीय, पण यावेळेस माझ्या डोळ्यात अश्रू होते. एकदा नाही, दोन तीन वेळा मी रडलो, असं जसप्रीत बुमराह म्हणाला.