Tokyo Olympics : भारतीय हॉकी संघाचा ऐतिहासिक विजय; कांस्यपदकावर कोरले नाव
![Tokyo Olympics: Indian hockey team's historic victory; Name engraved on the bronze medal](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Capturevsvsggegrg-1.jpg)
टोकियो – टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास घडवला आहे. हॉकी संघाच्या कामगिरीमुळे तमाम भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. जर्मनीवर मात करत भारताने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय संघाला हॉकीमध्ये पदक मिळाले आहे. तेदेखील अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला. भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे. यापूर्वी भारताने वासुदेवन भास्करनच्या नेतृत्त्वात 1980 मध्ये मॉक्सो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले होते. आता आजच्या पदाकासह ऑलिम्पिकमध्ये हॉकीत भारताच्या पदकांची संख्या 12 इतकी झाली आहे. यापैकी 8 सुवर्णपदके, एक रौप्यपदक आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे.
आजच्या सामन्याच्या सुरुवातीला पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारतीय संघाने नंतर दमदार पुनरागमन केले. सामना सुरू झाल्यावर अवघ्या काही मिनिटांतच पहिला गोल डागत जर्मनीने आघाडी घेतली होती. जर्मनीच्या वतीने तिमुर ओरुजने गोल केला होता. मात्र भारताने आपल्या संयमी खेळीच्या जोरावर जर्मनीचे हे आव्हान संपुष्टात आणले. भारताचा गोलकिपर श्रीजेशने उत्तम खेळी करत जर्मनीचे अनेक गोल परतवून लावले. भारतासाठी सिमरनजीत सिंहने दोन, हरमनप्रीत सिंह, रुपिंदर पाल सिंह आणि हार्दिक सिंहने प्रत्येक एक-एक गोल डागत सामन्यात जर्मनीवर मात करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली.
भारताची सुरुवात काहीशी निराशाजनक होती. जर्मनीने सामन्याच्या पहिल्या मिनिटातच गोल डागत 1-0 ने आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताला पाचव्या मिनिटाला वापसी करण्याची संधी मिळाली. मात्र पेनल्टी कॉर्नवर गोल करण्यात रुपिंदर पाल सिंह अपयशी ठरला. मग भारताने दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला धमाकेदार खेळी करत सतराव्या मिनिटाला गोल डागला. सिमरनजीत सिंहने हा गोल डागला आणि सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर जर्मनी आणखी आक्रमक होताना दिसली. मात्र लगेचच हार्दिक सिंहने या सामन्यात भारताला वापसी मिळवून दिली आणि पेनल्टी कॉर्नरवर गोल करत 2-3 अशी आघाडी घेतली. त्यानंतर भारताने 28व्या मिनिटाला आणखी एक गोल डागत सामन्यात बरोबरी साधली. मग तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आणखी दोन गोल डागले. चौथा गोल 31व्या मिनिटाला रुपिंदर पाल सिंहने आणि 34व्या मिनिटाला सिमरनजीत सिंहने पाचवा गोल डागला. आता भारताने 5-3 अशी आघाडी घेतली होती. मग चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला जर्मनी काहीशी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जर्मनीने चौथा गोल डागत सामना 5-4 अशा रोमांचक वळणावर आणला. मात्र वेळ संपली आणि जर्मनीचे कांस्य पदक मिळवण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.