आयपीएल, टी २० वर्ल्ड कप संदर्भात बीसीसीआयची विशेष बैठक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/BCCi.png)
मुंबई – आयपीएल १४च्या उर्वरित ३१ सामन्यांबाबत पुढील निर्णय घेण्यासाठी आणि टी २० वर्ल्डकप संदर्भातील निर्णयासाठी बीसीसीआयची उद्या, शनिवार २९ मे २०२१ रोजी विशेष बैठक होणार असल्याचे वृत्त आहे. देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना द्यायच्या पैशांबाबतही याच बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बैठकीसाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे आज मुंबईत दाखल होणार आहेत.
भारतात आयपीएलच्या चौदाव्या सीझनचे सामने सुरू होते. परंतु खबरदारी घेऊनही काही संघांच्या सदस्यांना कोरोना झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर आयपीएल स्थगित करण्यात आली. त्यामुळे आता प्ले ऑफ, क्वालिफायर, एलिमिनेटर आणि फायनल या सर्व फेऱ्यांच्या मिळून ३१ मॅच खेळायचे बाकी आहेत. महत्त्वाचे म्हणजे पॉइंट्स टेबलमध्ये दिल्ली (१२ गुण) पहिल्या, चेन्नई (१० गुण) दुसऱ्या, बंगळुरू (१० गुण) तिसऱ्या, मुंबई (८ गुण) चौथ्या, राजस्थान (६ गुण) पाचव्या, पंजाब (६ गुण) सहाव्या, कोलकाता (४ गुण) सातव्या आणि हैदराबाद (२ गुण) आठव्या स्थानावर अशी स्थिती होती.