आयसीसी टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ५ गडी राखून विजय
नवी दिल्ली : आयसीसी टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ५ गडी राखून विजय मिळवला आहे.
टि-२० विश्वचषक स्पर्धेत आज (दि.३०) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पर्थच्या मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ५ गडी राखून विजय मिळवला. लुंगी एनगिडीचा भेदक मारा आणि डेव्हिड मिलरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने हा विजय संपादन केला.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर १३४ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रथम फलंदाजी करत असताना लुंडी एनगिडीच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघाने नांगी टाकली. सूर्यकुमार यादव शिवाय इतर कोणीही चांगली खेळी करू शकले नाही. भारताने दिलेल्या १३४ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करत असताना अॅडम मार्करम आणि डेव्हिड मिलरच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने विजय संपादन केला.
दक्षिण आफ्रिकेकडून अॅडम मार्करम ४१ चेंडूमध्ये ५२, डेव्हिड मिलरने ४६ चेंडूमध्ये ५९ धावा केल्या. तर टेम्बा बवुमा १५ चेंडूमध्ये १० धावा करत स्वस्तात माघारी परतला. अर्शदीप सिंगने आफ्रिकेला सुरुवातीचे झटके देत भारताच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. भारतीय खराब क्षेत्ररक्षणामुळे दक्षिण आफ्रिकेने सामन्यात पुन्हा एकदा आघाडी मिळवली. भारताकडून अर्शदीप सिंगने ४ षटकांमध्ये २५ धावा देत २ विकेट्स पटकावल्या. तर मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी १ विकेट पटकावली.