बीसीसीआयकडून खेल रत्न पुरस्कारासाठी मिताली राजसह आर. आश्विनची शिफारस
![Mithali Raj along with R for Khel Ratna award from BCCI. Ashwin's recommendation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Mithali-Raj-Ashwin.jpg)
नवी दिल्ली – भारतासाठी क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारासारखे पुरस्कार दिले जातात. त्यासाठी ठराविक वेळी केलेल्या अप्रतिम कामगिरीवर क्रिडापटूंची निवड केली जाते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यंदाच्या पुरस्कारांसाठी 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2020 दरम्यान अप्रतिम कामगिरी केलेल्या खेळाडूंची नावे पुरस्कारासाठी सुचविली आहेत. देशातील खेळाडूंसाठी सर्वात मानाच्या पुरस्कारांपैकी एक असणाऱ्या खेल रत्न पुरस्कारासाठी बीसीसीआयने भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राजसह फिरकीपटू आर. आश्विनच्या नावाची शिफारस केली आहे. तर अर्जुन पुरस्कारासाठी तिघा युवा क्रिकेटपटूंची नावे बीसीसीआयने सुचविली आहेत. यामध्ये जसप्रीत बुमराह, के एल राहुल आणि शिखर धवन यांच्या नावांचा समावेश आहे.
29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय खेल दिवसाचे औचित्य साधून या पुरस्कारांचे वितरण केले जाणार असून खेल आणि युवा कल्याण मंत्रालयाद्वारा पुरस्कारांसाठी नामांकन पोहोचवण्याची शेवटची तारीख 5 जुलै आहे. दरम्यान, मंत्रालयाने क्रिकेटसह हॉकी इंडियाकडून गोलकीपर पीआर श्रीजेशचे नाव खेल रत्न आणि हरमनप्रीत सिंह, वंदना कटारिया आणि नवज्योत कौर यांचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित केले आहे. तर भारतीय एथलेटिक्स फेडरेशनने ओडिशा सरकारकडून धावपटू दुती चंदचे नाव खेल रत्न पुरस्कारासाठी सुचवले आहे.