अखेर आयपीएलचा मुहूर्त ठरला; आयपीएलच्या तारखांबाबत बीसीसीआयची अधिकृत घोषणा
मुंबई – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातील इंडियन प्रीमियर लीग या क्रिकेट लीगचे 31 सामने स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. दरम्यान, 29 सामने झाल्यानंतर उर्वरित सामने स्थगित केल्यामुळे बीसीसीआयला याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार हे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर उर्वरित सामने खेळवणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता बीसीसीआयने याच्या अधिकृतरित्या तारखा घोषित केल्या आहेत.
आयपीएल 2021 च्या मोसमातील उर्वरित 31 सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या 14 व्या हंगामातील उर्वरित सामने युएईमध्ये होणार असून टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या आधी हे सामने खेळवण्याची बीसीसीआयची योजना आहे.
आयसीसीने टी -20 विश्वचषकांच्या तारखांची अधिकृत घोषणा केलेली नाही. जुलैमध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेविषयी अंतिम घोषणा होण्याची शक्यता आहे. हा विश्वचषक भारतात होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. परंतू कोरोनाची परिस्थिती पाहता याबद्दल बीसीसीआयने अद्याप माहिती दिलेली नाही. त्यामुळे यंदाचा टी-20 विश्वचषक देखील युएईमध्ये खेळवण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहेे. भारतीय संघाचा इंग्लंड दौरा संपताच आयपीएलचा थरार रंगणार आहे. कोरोनामुळे उर्वरित आयपीएलमध्ये परदेशी खेळाडू खेळण्याची शक्यता कमी आहे. अनेक खेळाडू आपापल्या संघाच्या दौऱ्यात आहेत. तर आयपीएलमध्ये खेळणारे काॅरिबियन खेळाडू देखील खेळण्याची शक्यता कमी आहे.