#INDvsENG आज भारत मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी मैदानात उतरणार
अहमदाबाद – भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेत भारत सध्या 1-2 ने पिछाडीवर असून आज सायंकाळी 7 वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या मालिकेचा चौथा सामना खेळविण्यात येणार आहे. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणे आवश्यक आहे, तर हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्यावर इंग्लंडचीही नजर असेल. दरम्यान, कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे अहमदाबादमधील रिकाम्या स्टेडियममध्ये पुन्हा एकदा सामना खेळवला जाईल.
दरम्यान, तिसर्या टी 20 सामन्यात इंग्लंडने भारताचा सहज पराभव केला. या पराभवानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने चौथ्या टी 20 संघात बदलांचे संकेत दिले होते. कोहली म्हणाला की, पुन्हा एकदा संघ निवडीबद्दल विचार करावा लागेल. महत्त्वाचे म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारण्याचा पायंडाच जणू पडला आहे. कारण या मैदानावर पाठलाग करणाऱ्या संघालाच सामना जिंकता आलेला आहे. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकावी, याची आशा धरण्यापेक्षा समाधानकारक धावसंख्येचे लक्ष्य उभारणे किंवा प्रतिस्पर्ध्यांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याकडे गांभीर्याने पाहावे लागणार आहे.
भारत संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.
इंग्लंड संघ
इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम कुरन, टॉम कुरन, ख्रिस जॉर्डन, लिम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मालन, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स , रीस टोपली आणि मार्क वुड.