ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणेने फारशा धावा केल्या नाहीत.
भारताचे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि इरफान पठाण यांनी अजिंक्य रहाणेवर निशाणा साधला आहे. रहाणे हा खूप भाग्यवान आहे की त्याला आतापर्यंत संघात राहण्याची संधी मिळत आहे आणि त्याचवेळी संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारीही मिळत आहे, असे गंभीरचे मत आहे. दुसरीकडे इरफान पठाणला विश्वास आहे की या कसोटी मालिकेतील सर्वांच्या नजरा नक्कीच त्याच्या कामगिरीवर असतील आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करावीच लागेल. रहाणे गेल्या एक वर्षापासून खराब फॉर्मशी झुंजत आहे.ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने फारशा धावा केल्या नाहीत. रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे दोघेही त्यांच्या फलंदाजीमुळे गेल्या काही काळापासून टीकेचे धनी ठरत आहेत. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गंभीरने अजिंक रहाणेवर निशाणा साधला आहे. ‘मला वाटते की रहाणे खूप भाग्यवान आहे, तो संघाचे नेतृत्व करत आहे आणि म्हणूनच कदाचित तो संघात राहिला आहे. इंग्लंडच्या मालिकेत त्याची जशी कामगिरी होती त्यावरुनही तो संघात राहणे ही मोठी गोष्ट आहे, असे गौतम गंभीरने म्हटले आहे. रहाणेने इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या चार कसोटी सामन्यांमध्ये १५.५७ च्या सरासरीने फक्त १०९ धावा केल्या होत्या.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना २५ नोव्हेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत विराट कोहली खेळत नसल्यामुळे रहाणे संघाचे नेतृत्व करत आहे, दुसरी कसोटी मुंबईत खेळवली जाणार असून कसोटी कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन होणार आहे. रहाणेच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल आणि तो आणखी चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे, असेही इरफान म्हणाला.
दरम्यान, स्टार स्पोर्ट्सच्या ‘गेम प्लॅन’मध्ये बोलताना कसोटी सामन्यासाठी गंभीरने सलामीवीर म्हणून मयंक अग्रवाल आणि केएल राहुलची निवड केली आणि शुभम गिलला चौथ्या क्रमांकावर स्थान दिले आहे.
तसेच अजिंक्य रहाणेने त्याच्या शेवटच्या १५ कसोटी सामन्यांमध्ये २४.७६ च्या सरासरीने ६४४ धावा केल्या आहेत. स्पिनर आणि वेगवान गोलंदाज या दोघांनीही त्याला वेगवेगळ्या प्रकारे बाद करून त्रास दिल्याने त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही.