हिटमॅनची विकेट ढापली? नेटीझन्स पंचांवर भडकले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Rohit-after-getting-Out.jpg)
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या सामन्यात रोहित शर्माला तिसऱ्या पंचांनी बाद ठरवल्याच्या निर्णयावर सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. रोहित शर्माने २३ चेंडूत १ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने आश्वासक सुरुवात केली होती. केमार रोचच्या गोलंदाजीवर खेळत असताना चेंडू रोहितची बॅट आणि पॅड यांच्यामधून यष्टीरक्षकाकडे गेला.
विंडीजच्या खेळाडूंनी रोहित बाद असल्याचं अपील केलं, मात्र पंच रिचर्ड इलिंगवर्थ यांनी ते फेटाळून लावलं. तिसऱ्या पंचांच्या पाहणीतही Ultra age प्रणालीवर चेंडू स्पष्टपणे बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात गेल्याचं सिद्ध होतं नव्हतं. मात्र तिसरे मंच मायकल गॉग यांनी रोहित बाद असल्याचा निर्णय दिला. या प्रकारानंतर भारतीय चाहत्यांनी आपली नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर पंचांना आपल्या टिकेचं लक्ष्य बनवलं आहे.
दरम्यान रोहित शर्मा माघारी गेल्यानंतर भारताच्या डावाला गळती लागली. लोकेश राहुल, विजय शंकर, केदार जाधव हे फलंदाज झटपट माघारी परतले.