“शरिराची हालचाल मंदावल्याचं लक्षण आहे” विराटच्या खराब कामगिरीवर माजी कर्णधाराचं मत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-36.png)
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्यात पराभवाचा सामना करावा लागला. वन-डे मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही भारताने व्हाईटवॉश स्विकारला. कर्णधार विराट कोहलीचं अपयश हे भारतीय संघाच्या पराभवामागचं प्रमुख कारण मानलं जातंय. दोन कसोटी सामन्यातील चारही डावांत त्याने २० पेक्षा जास्त धावसंख्या ओलांडली नाही. भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी विराटच्या या खराब कामगिरीवर आपलं मत व्यक्त केलं आहे.
“ज्यावेळी तुम्ही वयाची तिशी ओलांडता त्यावेळी साहजिकपणे तुमच्या दृष्टीवर परिणाम व्हायला लागतो. काही वर्षांपूर्वी स्विंग चेंडू विराट सहज चौकारासाठी तटवायचा. मात्र या दौऱ्यात दोनवेळा बाद झालाय, माझ्यामते त्याने यावर काम करुन अधिक सराव करण्याची गरज आहे”, कपिल देव यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना असं मत व्यक्त केलं आहे…
ज्यावेळी टप्पा पडून आत येणाऱ्या चेंडूवर मोठे फलंदाज त्रिफळाचीत किंवा पायचीत व्हायला लागतात त्यावेळी माझ्यामते त्यांना अधिक सराव हा एकच पर्याय उरतो. तुमच्या शरिराची हालचाल मंदावल्याचं हे लक्षण आहे. सुरुवातीला ही गोष्ट फारशी मोठी वाटत नाही, मात्र याकडे लक्ष दिलं नाही तर ही बाब तुमचा कच्चा दुवा म्हणून तयार होते. १८ ते २४ वयापर्यंत तुमची नजर ही तीक्ष्ण असते…मात्र काहीवेळाने त्यावर परिणाम होतो, कपिल देव विराच्या खराब कामगिरीबद्दल बोलत होते.