या खेळाडूवर २५ कोटींची बोली लागली असती’
IPL २०१९ साठी मंगळवारी लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावामध्ये एकाही खेळाडूला दहा कोटीपेक्षा जास्त रक्कम मिळाली नाही. पण जर भारताचा माजी कर्णधार कपिल देव या लिलाव प्रक्रियेत असता, तर त्याला IPL च्या लिलावामध्ये तब्बल २५ कोटींची बोली लागली असती, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.
कपिल देव यांनी भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते. त्यामुळे जर IPL च्या लिलावात त्यांच्यावर बोली लावली गेली असती, तर त्यांच्यावर २५ कोटी रुपयांचीही बोली लागली असती. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ साली विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर कपिल यांनी १७५ धावांची जी खेळी साकारली होती, ती अविस्मरणीय होती, असे ते गावसकर म्हणाले.
यावर कपिल देव यांनीही मिश्किल शब्दात उत्तर दिले. जर IPL च्या लिलावात मला २५ कोटी रुपये मिळाले असते, तर त्यामधील १०-१५ कोटी रुपये मी गावस्कर यांना दिले असते, असे कपिल म्हणाले.
दरम्यान, IPL च्या या लिलावामध्ये नावारुपाला न आलेल्या वरुण चक्रवर्तीला तब्बल 8.40 कोटी रुपये मिळाले आणि साऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. पण दुसरीकडे नावारुपाला आलेल्या खेळाडूंची मात्र यावेळी बोळवण करण्यात आली. युवराज सिंगसारख्या नावाजलेल्या खेळाडूला पहिल्या फेरीत कुणीही वाली नव्हता. पण दुसऱ्या फेरीत मात्र युवराजला मूळ किंमत असलेल्या एक कोटी रक्कमेवर मुंबई इंडियन्सने आपल्या संघात दाखल करून घेतले.