मला गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल, पण…: शोएब अख्तर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Shoaib-Akhtar.jpg)
लाहौर: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शोएब नेहमी त्याच्या अतिशयोक्ती वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. त्याच्या वक्तव्यांमुळे त्याला नेटीझन्सकडून अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलदेखील करण्यात आलं आहे. त्याने आता पुन्हा एकदा नवं वक्तव्य केलेलं आहे. पाकिस्तानच्या एका प्रसारमाध्यमासोबत बोलताना त्याने पाकिस्तान सरकारला आर्थिक बजेटमध्ये सैन्यासाठी जास्त पैशांची तरतूद करण्याबाबत आवाहन करणारं वक्तव्य केलेलं आहे.
“जर मला परमेश्वराने अधिकार दिले तर मी आर्थिक बजेटमध्ये पाकिस्तानी सैन्यासाठी जास्त पैशांची तरतूद करेन. त्यासाठी मला गुरांचा चारा खावा लागला तरी चालेल”, असं शोएब अख्तर म्हणाला आहे. शोएब एवढ्यावरच थांबलेला नाही. “मी आर्मी चीफला माझ्यासोबत बसवून निर्णय घ्यायला सांगेन. जर पाकिस्तानी सैन्यासाठी आर्थिक बजेट 20 टक्के तरतूद असेल तर मी 60 टक्के करेन. जर आपण एकमेकांचा आदर करणार नाही तर आपलंच नुकसान आहे”, असंदेखील तो म्हणाला आहे. “मी देशासाठी गोळी खायला तयार होतो. 1999 साली झालेल्या कारगील युद्धात मला लढायचं होतं त्यामुळेच मी त्यावर्षी काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी नकार दिला होता”, असं शोएब अख्तरने सांगितलं आहे.
याआधीदेखील शोएब अख्तरने अशाप्रकारचे बरेच वक्तव्य केलेले आहेत. काही दिवसांपूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागविषयी त्याने वक्तव्य केलं होतं. “सेहवागने ‘बाप बाप असतो आणि मुलगा मुलगा असतो’, असं वक्तव्य खरंच केलं असतं तर त्याला मारलं असतं”, असं शोएब अख्तर म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यावरुन भारतीय नेटीझन्सनी सोशल मीडियावर त्याला चांगलंच झोडपलेलं होतं.