“संविधान भारतीय लोकशाहीचा आत्मा”: डॉ. नारायण टाक
जेजुरीत संविधान दिन उत्साहात : भीमरत्न पुरस्कारांनी मान्यवरांचा गौरव

जेजुरी : स्वातंत्र्यानंतर भारताने संसदीय लोकशाहीची वाट निवडली आणि कायद्याच्या राज्याची पायाभरणी केली. या लोकशाही व्यवस्थेला अधोरेखित करणारे भारतीय संविधान हे राष्ट्राचे मार्गदर्शक तत्व असून तेच भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे, असे मत संविधान अभ्यासक प्रा. डॉ. नारायण टाक यांनी व्यक्त केले. आर.पी.आय. विचार मंचतर्फे जेजुरी येथे संविधान दिनाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. नारायण टाक, दैनिक भास्कर पुणे संपादक मुनीश शर्मा, राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नंदकिशोर सागर, ससून रुग्णालयातील डी.एन. डॉ. काशीद, लेखक–पत्रकार दिनकर कडू, तालुका शिक्षक संघ अध्यक्ष दत्तात्रय रोकडे, प्राचार्य कुंडलिक मेमाणे, वसंतराव ताकवाले, रामभाऊ पेठकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांची उजळणी करण्यात आली. “संविधान निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान हे भारतीय लोकशाहीचे सर्वोच्च अधिष्ठान आहे,” असे प्रतिपादन डॉ. टाक यांनी केले.
हेही वाचा – पीसीसीओइआरच्या खेळाडूंची बॉल बॅडमिंटन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी
कार्यक्रमात पत्रकारिता, शिक्षण, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना भीमरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रातील संविधान जागृती व नागरिकांच्या कर्तव्याबाबत प्राचार्य डॉ. नंदकिशोर सागर यांनी प्रभावी विचार मांडले.
आर.पी.आय. पुणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ जाधव हे मागील सोळा वर्षांपासून संविधान दिनाचे आयोजन सातत्याने करीत असून त्यांचा विशेष सन्मानही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय रोकडे यांनी केले.




