Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पालखी मार्गावरील अडथळे दूर करा; पुणे महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला आदेश

पुणे | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांवर संकट व्यवस्थापन कक्ष, पुरेसा पाणीपुरवठा, वारकऱ्यांसाठी शौचालये या सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच पालखी मार्गावरील पावसाळी गटारे, चेंबर दुरुस्ती, रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी दिले आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुणे शहरात होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी सोमवारी पालखी मार्गांची पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी, ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, युवराज देशमुख, उपायुक्त अविनाश संकपाळ यांच्यासह क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी या वेळी उपस्थित होते. पालखी मार्गावरील बेवारस गाड्या आणि अडगळीच्या वस्तू उचलून त्यांची विल्हेवाट लावावी. पालखी मार्गांवरील अतिक्रमणे काढण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा   :    काँग्रेस नेत्या संगीता तिवारी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत, पुणे शहराध्यक्षांवर गंभीर आरोप

पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी कक्ष सुरू केले जाणार असून, यामध्ये आरोग्य सुविधा, आराम करण्यासाठी व्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी, पंखे, मोबाइल टॉयलेट्स यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. वाहतूक सुरळीत राहावी. तसेच, पालखी दिंडी सोहळ्यास वाहतुकीचा अडथळा होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत आवश्यक त्या सूचना पोलिसांना करण्यात आल्या. महापालिकेच्या पथ विभागाने पदपथ व रस्ते यांची डागडुजी करून घ्यावी. पालखी मार्गावरील अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यात आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये, याकरिता अग्निशमनविषयक सुविधा देण्यात येणार आहेत.

पालखी मार्ग, पालखी व दिंड्यांच्या मुक्कामांची ठिकाणे विचारात घेऊन पालखी मार्गावर व सर्व पेठांमध्ये २४ तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पालखी पुणे मुक्कामी असताना विद्युत व्यवस्था खंडित होणार नाही, याबाबत संबंधितांना सूचना करण्यात आल्या आहेत.

संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुढील महिन्यात शहरात मुक्कामी येणार आहे. या काळात वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. याचा आढावा वेळोवेळी घेतला जाणार आहे.

– डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button