दिल्लीश्वर कितीही कपटी असला तरी महाराष्ट्र झुकणार नाही; जयंत पाटलांचा इशारा
![No matter how insidious Delhi is, Maharashtra will not bow down; Jayant Patil's warning](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/jayant-patil.png)
पुणे | प्रतिनिधी
आपले सरकार काहींच्या डोळ्यात सलत आहे. त्यामुळे आधी आमदार विकत घेण्याचा प्रयत्न झाला. आता मंत्र्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना खोट्या आरोपात गोवण्यात आले. नवाब मलिक एनसीबी विरोधात बोलत होते म्हणून त्यांना त्यांची भूमिका मांडू न देता अटक करण्यात आली. ही मावळची भूमी आहे. इथली माती शिवरायांचे शौर्य आपल्याला सांगते. त्यामुळे दिल्लीश्वर कितीही कपटी असला तरी महाराष्ट्र झुकणार नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. ते मावळमध्ये बोलत होते.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, एकदा आम्ही महाराष्ट्रात 72 आमदारांच्या संख्येवर पोहोचलो होतो. राज्यात मुख्यमंत्री करण्याची संधी आमच्या पक्षाला आली होती. पण सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी ती संधी आम्ही सोडल्याचे पाटील म्हणाले. 2024 ला आम्ही 114 लढवू किंवा 120 लढवू आघाडी ज्यावेळी होईल त्यावेळी निर्णय होईल. पण जेवढ्या जागा लढवू तेवढ्या सगळ्या जागा निवडून आणण्याची जिद्द आपण बाळगली पाहिजे. आजही पवारसाहेब 24 तास काम करत आहे. त्यामुळे 2024 ला सगळ्यात मोठी गिफ्ट द्यायची असल्याचे पाटील म्हणाले.
आपल्या विरोधात कारवाया सुरू आहेत. तुम्ही याची नोंद घ्या, आम्ही ठामपणे सांगतो की, महाविकास आघाडी ही महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आली आहे. कोणीही किती अडथळे आणले तरी महाराष्ट्र सरकार आपले काम पूर्ण करणारच. आज तळागाळात पक्ष उभा होत आहे. एक -एक कार्यकर्ता पक्षाशी जोडला जात आहे. आज पक्षाकडे तरुणांची मोठी फळी निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्याचा महाराष्ट्र हा राष्ट्रवादीमय असणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.