50 टक्के थकबाकी भरल्यास वीजबिल कोरे, कृषी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी मार्चपर्यंत संधी
![If 50 per cent arrears are paid, the electricity bill will be empty.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/pjimage-34-1.jpg)
पुणे | कृषिपंप वीज बिलाची थकबाकी मुक्तीसाठी थकीत रकमेत सुमारे 66 टक्के सवलत मिळविण्याच्या संधीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. येत्या मार्च 2022 पर्यंत चालू वीजबिल तसेच सुधारित थकबाकीमधील केवळ 50 टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ करण्यात येत आहे. आतापर्यंत या योजनेत पश्चिम महाराष्ट्रातील 6 लाख 45 हजार 812 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून त्यापैकी 1 लाख 94 हजार 381 शेतकऱ्यांनी थकबाकीमध्ये सुमारे 66 टक्के सवलत घेत संपूर्ण वीजबिल कोरे केले आहे.प्रामुख्याने कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील 12 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील व्याज व विलंब आकारातील सूट तसेच महावितरणकडून निर्लेखनाचे एकूण 2,644 कोटी 79 लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. तसेच वीजबिलांच्या दुरूस्तीमधून 199 कोटी 39 लाख रूपयांचे समायोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांकडे वीजबिलांपोटी 7,997 कोटी 75 लाख रूपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यापैकी 50 टक्के थकबाकीचा दि.31 मार्च 2022 पर्यंत भरणा केल्यास उर्वरित 50 टक्के म्हणजे तब्बल 3,998 कोटी 87 लाख रूपयांची माफी मिळणार आहे.
पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 6 लाख 45 हजार 812 शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीचे एकूण 929 कोटी 54 लाख रुपयांचा भरणा केला आहे. यामध्ये या सर्व शेतकऱ्यांना भरलेल्या थकबाकीएवढीच 432 कोटी 30 लाख रूपयांची माफी तसेच निर्लेखन, व्याज व विलंब आकारातील सवलतीचे 1239 कोटी असे एकूण 1671 कोटी 30 लाख रूपयांची मूळ थकबाकीमध्ये सूट मिळाली आहे.
कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्यांनी राज्यात आघाडी घेतली असून आतापर्यंत 1 लाख 94 हजार 381 शेतकर्यांनी योजनेचा लाभ घेत संपूर्ण वीजबिल कोरे केले आहे. महावितरण सध्या आर्थिक संकटात असल्यामुळे ज्यांचा योजनेत सहभाग नाही तसेच चालू वीजबिलांचा भरणा देखील नाही अशा कृषिपंपधारकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई करण्यात येत आहे. सुधारित थकबाकीमध्ये 50 टक्के माफी मिळविण्याची संधी येत्या मार्च 2022 पर्यंत असल्याने थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे व चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.