अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत मिळेना!
![Farmers affected by heavy rains do not get help!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/pv-farm-780x470.jpg)
पुणे : राज्य सरकारकडून विदर्भातील अतिवृष्टी बाधितांसाठीचा मदत निधी २१ सप्टेंबर रोजी संबंधित तहसीलदारांकडे वर्ग झाला आहे. तलाठी, कृषी साहाय्यक, ग्रामसेवक यांनी अतिवृष्टी बाधितांचे सव्र्हेक्षण, माहितीचे संकलन पूर्ण केले आहे. मात्र, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक जमा करून संबंधित बँकांना त्याची माहिती कुणी द्यायची, या बाबत समन्वय नसल्यामुळे अतिवृष्टी बाधितांना आजवर सरकारी मदत मिळू शकली नाही.
जुलै महिन्यांत विदर्भात अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप हंगामातील पिके मातीमोल झाली होती. अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची दखल घेऊन राज्य सरकारच्या वतीने खरीप पिकांसाठी प्रति हेक्टर १३, ६०० आणि फळपिकांसाठी २६,००० रुपये या निकषांनुसार मदत मिळणार आहे. या बाबतचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत तहसीलदारांकडे २१ सप्टेंबर रोजी वर्गही झाला आहे. पण, अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर बाधित शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.