41 लाखांच्या वीजबिलांचे 18 लाख भरून 10 कृषी ग्राहक थकबाकीमुक्त
![Out of 41 lakh electricity bills, 18 lakh have been paid and 10 agricultural consumers are in arrears](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/Mahavitarna.jpeg)
पुणे |
16 फेब्रुवारी 2021: कृषिपंपाच्या वीजबिलांपोटी 41 लाख 50 हजार रुपयांची थकबाकी असताना कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 अंतर्गत उरळी कांचन परिसरातील 10 कृषी ग्राहकांनी 18 लाख 50 हजार रुपयांचा भरणा करून सोमवारी (दि. 15) थकबाकीमुक्ती मिळविली आहे.
पुणे परिमंडलात कृषीपंपधारक शेतकरी व कृषी ग्राहकांना वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्यासाठी व्याज, विलंब आकारात तसेच मूळ थकबाकीमध्ये 50 टक्केपर्यंत माफी देणाऱ्या योजनेची वेगाने अंमलबजावणी सुरु झालेली आहे. मुळशी विभाग अंतर्गत उरळी कांचन, कुंजीरवाडी, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, आळंदी म्हातोबा या गावांतील 10 कृषिपंपधारक शेतकरी व कृषीग्राहकांकडे वीजबिलांपोटी सुमारे 41 लाख 50 हजार रुपयांची थकबाकी होती. थकबाकीमुक्तीच्या योजनेतील सवलतीप्रमाणे या ग्राहकांनी सोमवारी (दि. 15) 18 लाख 50 हजार रुपयांचे धनादेश उरळीकांचन कार्यालयात जमा केले. यावेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता श्री. रवींद्र बुंदेले यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य अभियंता तालेवार यांच्याहस्ते थकबाकीमुक्त झालेल्या कृषी ग्राहकांचा गौरव करण्यात आला. वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसोबतच गाव व जिल्ह्यातील वीजयंत्रणेच्या विकासाला वेग देणारी ही ऐतिहासिक योजना आहे. त्याचा सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालेवार यांनी केले.
कार्यक्रमाला उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे, के. डी. बापू कांचन, चंद्रलेखा रामराव जगताप, बापू घुले, श्रीदत्त सहकारी पाणीपुरवठा, म्हातोबा गौतम सहकारी पाणीपुरवठा योजनेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. भरणा केलेल्या वीजबिलाच्या रकमेतील 33 टक्के रक्कम संबंधीत ग्रामपंचायत क्षेत्र व 33 टक्के रक्कम जिल्हा क्षेत्रातील वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. कृषी ग्राहकांच्या थकीत वीजबिलातील विलंब आकार, व्याज व मूळ थकबाकीमध्ये 50 टक्क्यांपर्यंत माफी मिळत असल्यामुळे या योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.