शिवसेनेचे नवोदित मंत्री बोगस पदवीने अडचणी
पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|
राज्याचे माजी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या नंतर आता पुन्हा एकदा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची बोगस विद्यापीठाची पदवी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे ते चर्चेत आले आहेत.
त्यामुळे उदय सामंत अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री हे ज्ञानेश्वर विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. उदय सामंत यांच्या विधानसभा प्रतिज्ञापत्रात पदविकेचा आणि विद्यापीठाचा उल्लेख केला आहे. सामंत यांनी या विद्यापीठातून 1995 साली डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची पदविका घेतली आहे.
तावडे यांनीही याच विद्यापीठातून बीई पदवी घेतली होती. उदय सामंत यांच्या बोगस विद्यापीठाच्या पदवी प्रकरणी कॉप्स म्हणजेच केअर ऑफ पब्लिक सेफ्टीचे उपाध्यक्ष डॉ. अभिषेक हरदास यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.
ज्ञानेश्वर विद्यापीठाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांची परवानगी नाही. त्याचबरोबर उच्च न्यायालयाने या पदव्या अवैध ठरवले आहेत. त्यामुळे या पदव्यांचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख करणं अयोग्य असल्याचं अभिषेक हरदास यांनी म्हटलं आहे.