शिक्षक पात्रता परीक्षा अनुत्तीर्ण शिक्षकांची नोकरी धोक्यात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/2016_9largeimg205_Sep_2016_053849193.jpg)
पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनुउत्तीर्ण असलेल्या राज्यातील शिक्षकांना आणखी एक परीक्षा देण्याची संधी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने (एमएचआरडी)अमान्य केली आहे. त्यामुळे 31 मार्च 2019 पर्यंत टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांवर कार्यवाही करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. परिणामी राज्यातील सुमारे दोन हजार शिक्षकांची नोकरी धोक्यात येणार आहे.
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा ही शैक्षणिक पात्रता अनिवार्य केली.गेल्या काही वर्षांपासून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी टीईटी परीक्षा दिली आहे.सध्या शाळांमध्ये सेवेत असणा-या शिक्षकांनी 31 मार्च 2019 पर्यंत टीईटी परीक्षा उत्तीर्ण करावी,असे आदेश शासनातर्फे देण्यात आले होते. मात्र,अनेक शिक्षक या कालावधीपर्यंत टीईटी उत्तीर्ण उत्तीर्ण झाले नाहीत.
त्यामुळे संबंधित शिक्षकांना आणखी एक परीक्षा देण्याची संधी मिळावी,अशी विनंती एमएचआरडीकडे करण्यात आली होती. त्या अनुषंगाने टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना तूर्तास सेवेतून काढू नये, तसेच या शिक्षकांचे वेतन थांबवू नये, अशा सुचनाही राज्य शासनाने दिल्या होत्या. मात्र, एमएचआरडीकडे याबाबत करण्यात आलेली विनंती अमान्य झाल्यामुळे राज्यातील टीईटी परीक्षाा अनुत्तीर्ण असणा-या शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे.