विवाहबाह्य संबंधातून सावत्र भावाचे अपहरण करून खून
सावत्र भावाचे बायकोबरोबर असलेल्या विवाहबाह्य संबंधावरून आणि सामाईक बोअरच्या पाण्यावरून सावत्र भावाने आपल्या साथीदारांसह लहान भावाचे अपहरण करून डोक्यात दगड घालून हत्या केली. ही घटना आळंदी येथे गुरूवारी उघडकीस आली.
याप्रकरणी मयताच्या पत्नीने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीला अटक करून त्याच्या अन्य दोन साथीदारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फौजदार डी.एस शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व मयत हे दोघे सावत्र भाऊ आहेत. त्यापैकी खून झालेल्या इसमाचे आरोपीच्या बायकोबरोबर विवाहबाह्य संबंध होते. या संबंधाची माहिती आरोपीला मिळाली. तसेच ठाकर वस्ती येथील शेतातील सामाईक बोअरच्या पाण्यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. यामुळे चिडलेल्या आरोपीने बुधवारी रात्री आपल्या दोन साथीदारांस मयताचे अपहरण केले. त्याला चिंबळी येथील जंगलात नेऊन दारू पाजली. आरोपींनी मारहाण करत डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली.
आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत.