राहुल गांधीसह संपूर्ण काँग्रेसने रणांगण सोडले, रावसाहेब दानवेंची टीका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Ravsaheb-danve.jpg)
देशातली परिवार पार्टी अर्थात काँग्रेसला १०० वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. मात्र याच काँग्रेसची काय अवस्था झाली आहे बघा. त्यांच्याकडे कोणी अध्यक्षही राहिला नाही कोणी अध्यक्षपद घ्यायला तयारही नाहीत. राहुल गांधींसह संपूर्ण काँग्रेसने लोकसभा निवडणूक निकालानंतर रणांगण सोडले आहे अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली आहे. संघटन पर्व भाजपा सदस्यता अभियान शुभारंभाचा कार्यक्रम प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पार पडला. त्याचवेळी रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
या कार्यक्रमाला भाजपाचे खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, शहर अध्यक्ष योगेश गोगावले, आमदार मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. रावसाहेब दानवे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले असून 300 च्या पुढे गेलो आहोत. आता पुढील निवडणुकीत 400 च्या पुढे लक्ष्य आपल्यापुढे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसने देशात कायम अस्थिर वातावरण तयार केले असाही आरोप रावसाहेब दानवे यांनी केला. मतदारांना त्यांनी हेच दाखवण्याचा प्रयत्न केला की आता तुमच्यापुढे काँग्रेसशिवाय पर्याय नाही. मात्र त्याच काँग्रेसची सध्याची अवस्था काय हे तुम्ही पाहताच आहात असंही दानवे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात महायुतीच्या २२० पेक्षा जास्त जागा येणार : रावसाहेब दानवे
आगामी विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असलो, तरी आपल्या सर्वांनी कामाला लागावे.या निवडणुकीत आपले २२० पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचे आपले लक्ष्य आहे. यावर सर्वांनी लक्ष केंद्रित करावे आणि पक्षासोबत प्रत्येक नागरिकाला जोडण्याचे काम करण्याच्या सूचना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करण्यात आल्या.