राज्यातील मेट्रो प्रकल्प पांढरा हत्ती ठरेल – जलसंपदामंत्री जयंत पाटील
पुणे |महाईन्यूज|
‘सार्वजनिक वाहतूक योजना तोट्यात असते असा अनुभव आहे. सध्या नागपूर मेट्रो रेल्वे तोट्यात आहे,’ असं सांगतानाच, राज्यातील मेट्रो प्रकल्प पुढील दहा वर्षात ‘पांढरा हत्ती’ ठरेल,’ असं भाकित राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज वर्तवलं.
ते पुण्यात बोलत होते. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे राज्य सरकार स्वतःच्या खिशातून पैसे देत होते. सध्या नागपूर मेट्रो रेल्वे ही तोट्यात आहे. मेट्रो प्रकल्पांचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होईल,’ अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आज होत असलेल्या भेटीवरही त्यांनी यावेळी भाष्य केलं. ‘भारत हे एक संघराज्य आहे. संघराज्यात पंतप्रधान व मुख्यमंत्री वेगळ्या पक्षाचे असले तरी त्यांची भेट आवश्यक असते. हा संवाद चालू राहिला पाहिजे. हा संवाद चालू राहण्यासाठीच मुख्यमंत्री हे पंतप्रधानांना भेटणार आहेत,’ असं ते म्हणाले. ‘केंद्र सरकार आणि राज्य सरकार असा वाद नाही. महाराष्ट्र हे भारतातीलच राज्य आहे. केंद्र सरकार हे महाराष्ट्राशी दुजाभाव करणार नाही,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.