यंदा संमेलन यवतमाळला ; संमेलनासाठी ५० लाख, सरकारकडून मंजूरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/sahitya-sammelan_20170911171.jpg)
पुणे – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बडोदा येथील साहित्य संमेलनात केली होती. त्यानूसार शासनाकडून संमेलनासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचा अध्यादेश शासनाकडून गुरुवारी काढण्यात आला आहे.
९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा यवतमाळमध्ये होणार आहे. या संमेलनापासून पन्नास लाख रुपयांचे अनुदान मिळणार असल्याने आयोजकांना आर्थिक मदत होणार आहे. साहित्य महामंडळाने साहित्य संमेलनास अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे सादर करणे आवश्यक असेल. महामंडळाने प्रस्ताव पाठवल्यानंतरच संमेलनासाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. काही कारणास्तव एखाद्या वर्षी संमेलनाचे आयोजन न झाल्यास शासनातर्फे मंजूर करण्यात आलेली रक्कम शासनाच्या मान्यतेशिवाय इतरत्र वापरता येणार नाही, असे अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे.