माझा महाराष्ट्र, भाजपने अंधारात नेऊन ठेवलाय !
पुणे – 2014 मध्ये भाजपने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र , अशी जाहिरात करुन सत्तेत आलेल्या भाजप शिवसेना युती सरकारने आता माझा महाराष्ट्र अंधारात नेऊन ठेवल्याचा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसने करीत भारनियमनाविरोधी शनिवारी कंदील मोर्चा काढला.
लोकांना अंधारात ठेवणाऱ्या या सरकारच्या कारभारावर “प्रकाश’ पाडण्याकरिता हा मोर्चा काढला असून, दिवाळीआधी वीज कपात रद्द न केल्यास थेट मंत्र्यांच्या दारातच ठाण मांडू, अशा शब्दांत आंदोलनकर्त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारला ठणकाविले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार बापू पठारे, रवींद्र माळवदकर, नगरसेवक वनराज आंदेकर, प्रदीप गायकवाड, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, नितीन कदम, महिला आघाडीच्या हसीना इनामदार, अर्चना हनमघर, मृणालिनी वाणी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.