भीमा-कोरेगाव चौकशी आयोगाने शरद पवारांना बजावले समन्स
पुणे |महाईन्यूज|
भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भीमा-कोरेगाव चौकशी आयोगाने समन्स बजावले आहेत. त्यांना ४ एप्रिलपर्यंत आयोगाने चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
शरद पवार यांनी १८ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेतली. यात पोलीस दलाचा ज्या पद्धतीने गैरवापर झाला आहे त्याची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. तसेच, मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवर एक वेगळे वातावरण तयार केले होते. त्याचा परिणाम म्हणून ही हिंसा झाली, असा गंभीर आरोपही पवार यांनी केला होता.
यावरून या घटनेबाबत पवार यांच्याकडे अधिक माहिती असल्याचे दिसते. जी त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे आयोगासमोर सादर केलेली नाही. त्यामुळे न्याय होण्याच्या दृष्टीने आयोगाने पवार यांना समन्स बजवावा आणि त्यांनी संबंधित माहिती आयोगाकडे जमा करावी, अशी मागणी एका अर्जाद्वारे करण्यात आली होती. सागर शिंदे यांनी हा अर्ज चौकशी आयोगाकडे सादर केला होता. यानुसार शरद पवार यांना समन्स बजावण्यात आले असून त्यांना ४ एप्रिलपर्यंत आयोगाने चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.