नऊ वर्षे सेक्स न केल्यामुळे कोल्हापूरच्या दांपत्याला मिळाला घटस्फोट
मुंबई- लग्न झाल्यापासून नऊ वर्षात पती-पत्नीमध्ये एकदाही सेक्स न झाल्याने मुंबई उच्चन्यालायाने कोल्हापूरच्या एका जोडप्याचा विवाहच रद्द केला. लग्न झाले त्या दिवसापासून या जोडप्यामध्ये कायदेशीर लढाई सुरु होती. कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेऊन फसवून आपल्याशी लग्न करण्यात आले त्यामुळे हा विवाहच रद्द करावा अशी मागणी या महिलेने केली होती.
फसवणुकीने लग्न केल्याचा कोणाताही पुरावा नाहीय पण नऊ वर्षात या जोडप्यामध्ये शरीरसंबंध प्रस्थापित झाल्याचा कोणताच पुरावा नाहीय त्या आधारावर हे लग्न रद्द करण्यात येतेय असे निकाल न्यायाधीश मृदुला भाटकर यांनी दिला. पती-पत्नींमध्ये लैंगिक संबंध हे लग्नाचे महत्वाचे उद्दिष्टय असते. असे संबंध नसतील तर लग्नाचे उद्दिष्टयच पूर्ण होत नाही. एकदा जरी असे शरीरसंबंध आले तर त्यातून विवाहाची पूर्तता होते असे न्यायाधीश भाटकर म्हणाल्या.
या प्रकरणात पती-पत्नी लग्न झाल्याच्या दिवसापासून एकदिवसही एकत्र राहिले नाहीत. पतीने लैंगिक संबंध असल्याचा दावा केला पण त्याला एकही पुरावा सादर करता आला नाही. पुराव्याअभावी विवाहाची पूर्तता होत नसल्याचा महिलेचा दावा योग्य ठरतो असा निकाल कोर्टाने दिला.
आमच्यामध्ये लैंगिक संबंध होते व पत्नी गर्भवती होती असा दावा नवऱ्याने केला होता. पण पत्नी गर्भवती असल्याचा एकही पुरावा सादर करता आला नाही. कोर्टाने या जोडप्याला त्यांच्या मतभेदांवर तोडगा काढण्याचा सल्ला दिला होता. पण दोघेही परस्परांवर दोषारोप करत आहेत. असेच सुरु राहिले तर त्यांची पुढची अनेकवर्ष अशीच वाया जातील असे निरीक्षण नोंदवत कोर्टाने विवाहच रद्द केला. २००९ मध्ये लग्न झाले त्यावेळी मुलगी २१ वर्षांची तर नवरा २४ वर्षांचा होता. सत्र न्यायालयाने या प्रकरणात नवऱ्याच्या बाजूने निकाल दिला होता.