‘तान्हाजी’ द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात मराठा सरदारांचा चुकीचा इतिहास मांडला – संभाजी ब्रिगेड विरोध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/10-4.jpg)
पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|
‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात सूर्याजी पिसाळ या मराठा सरदाराची व्यक्तीरेखा चुकीच्या पद्धतीने, अपुऱ्या व अयोग्य माहितीच्या आधारे दाखवली जात आहे. त्यांना खलनायक, असत्यवादी, दोेषी, कटकारस्थानी, नकारात्मक दाखविले जात आहे. त्यामुळे चित्रपटातून त्यांच्या विषयीचा चुकीचा आशय बदलण्यात यावा, अन्यथा निर्मात्याला, दिग्दर्शकाला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष विकास पासलकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी श्रीमंत कोकाटे यावेळी उपस्थित होते.
पासलकर म्हणाले, संबंधित आशय बदलला नाही तर, आम्हाला यामुळे विनाकारण मानसिक त्रास दिल्याबद्दल व सूर्याजी पिसाळ यांच्या वारसदारांची मानहानी केल्याबद्दल चित्रपटांशी संबंधित सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर राज्यात चित्रपट दाखवू देणार नाही. विनाकारण बदनामी करणाऱ्यांना याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा पासलकरांनी दिला.
श्रीमंत कोकाटे म्हणाले, सूर्याजी पिसाळ यांची जी व्यक्तिरेखा दाखविली आहे. ती अत्यंत चुकीची असून संपूर्ण मराठा समाज व पिसाळ देशमुख कुटुंबीय हे कदापी मान्य करणार नाहीत. या चित्रपटाला संपूर्ण मराठा समाज पिसाळ देखमुख कुटुंबीयांचा विरोध आहे. सूर्याजी यांची व्यक्तिरेखा बदलावी तसेच त्यांच्याशी संबंधित आशयही बदलावा. अशी मागणी केली आहे.