तमाशा कलाकारांचा आमरण उपोषणाचा इशारा
![Tamasha performers on death row](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/मंगला.jpg)
पत्रकार परिषदेत कलावंतांची माहिती
पिंपरी । प्रतिनिधी
मराठी कलावंतांवर शासनाने अन्याय केला आहे. कलावंतांना जाहीर केलेले पकेज अद्याप कालावंताना जाहीर केले नाही. त्यामुळे आमची सहनशक्ती संपली आहे. म्हणून महाराष्ट्रातील सर्व तमाशा फड, लावणी, लोकधारा, ऑर्केस्ट्रा, नाट्य इ.सर्व क्षेत्रातील कलाकारासहित प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (८ जानेवारी) सकाळी ९ वाजल्यापासून आमरण उपोषणास बसणार आहेत. लोकनाट्य तमाशा फडमालक व कलावंत विकास संघाचे अध्यक्ष कलाभूषण रघुवीर खेडकर यांनी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली.
या वेळी संघाचे अध्यक्ष कलाभूषण रघुवीर खेडकर, कार्याध्यक्ष तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे करवडीकर, सचिव मुसा इनामदार, परिवर्तन कला महासंघ पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमर पुणेकर, किरण कुमार ढवळपुरीकर, संजय दत्ता महाडीक, शांताबाई संक्रापूरकर, गुलाब हाडशीकर, राजा बागुल, बाळासाहेब बेल्हेकर, कैलास नारायणगावकर कलाकार आदी उपस्थित होते.
खेडकर म्हणाले की, हळूहळू सर्व व्यवहार सुरु झाले असले तरीही अद्याप सरकारकडून गावजत्रा, तमाशा, लावणी, ऑर्केस्ट्रा किंवा कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमास खुल्या रंगमंचाची परवानगी मिळाली नाही. आम्हाला न्याय मिळावा, म्हणून आम्ही “तमाशा पंढरी नारायणगांव” येथे लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाची दखल घेऊन सरकारने कलावंतांना मदत म्हणून १८ कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर करुन अर्थखात्याकडे पाठविलेले असल्याचे सांगितले. परंतु अद्याप अर्थ खात्याने या पॅकेजला मंजुरी दिली नाही.
कार्याध्यक्ष मंगला बनसोडे म्हणाल्या, राज्यात सुमारे दीडशे लहान-मोठे तमाशा फड असून या फडाच्या माध्यमातून ७ ते ८ हजार कलावंत आपली कला सादर करून २५ ते ३० हजार कुटूंबियांची उपजिविका करत आहे. मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात अंदाजे ५०० ते ६०० गाव जत्रा असतात. परंतु मार्च २०२० मध्ये सर्वत्र पसरलेल्या कोरोनाच्या महामारीने सर्व व्यवहार बंद झाले. गावयात्रा रद्द झाल्या आणि सर्व तमाशा फड बंद पडले. तमाशातून उपजीविका करणाऱ्या हजारो लोकांची उपासमार झालेली आहे, आणि आजही होत आहे.