एल्गार परिषदेत महत्वाची भूमिका असलेल्या २ जणांना अटक
पुणे | पुण्यात २०१७ ला आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत महत्वाची भूमिका असलेल्या सागर गोरखे आणि रमेश गायचोर या कबीर कला मंचाच्या सदस्यांना एनआयएने नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. एल्गार परिषदेत या दोघांनी शाहिरी गीतेसादर केली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे कोरेगाव भीमा या ठिकाणी झालेल्या हिंसाचार प्रकरणात आधी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आठ दिवसांनी तुषार दामगुडे या व्यक्तीने कोरेगाव भीमा या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराला एल्गार परिषद कारणीभूत असल्याची तक्रार दिल्यानंतर पुण्यातील विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये सागर गोरखे , रमेश गायचोर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता. एनआयएने गेल्या महिन्यात या दोघांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर काल (८ सप्टेंबर) पुन्हा या दोघांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या चौकशीदरम्यान एनआय च्या अधिकाऱ्यांनी आपल्यावर माफीचा साक्षीदार बनण्यासाठी दबाव आणल्याचा दावा रमेश गायचोर आणि सागर गोरखे यांनी केला. तुम्ही नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचं कबुल करा. त्यानंतर तुम्हाला माफीचे साक्षीदार बनवू अशी ऑफर दिली होती असा दावाही या दोघांनी केला.
रमेश गायचोर आणि सागर गोरखे या दोघांवर २०११ साली देखील नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. २०१३ साली त्यांना अटक करण्यात आली होती आणि त्यांची जामीनावर सुटकाही करण्यात आली होती.