आयएमईडीतर्फे ‘डॉ.पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धा २०२१’ चे आयोजन
![‘Dr. Patangrao Kadam Bhavika Sharma, Bishna Chandran won first place in the National Eloquence Competition](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/पतंग.jpg)
९ जानेवारी रोजी राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन
पुणे | प्रतिनिधी
भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी)च्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाईन ‘डॉ.पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धा -२०२१’ चे आयोजन केले आहे. ९ जानेवारी २०२१ रोजी आयएमईडी, एरंडवणे, पौड रोड, पुणे येथे या स्पर्धा होणार आहेत. सकाळी साडे नऊ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी दिली.
या स्पर्धेचे आठवें वर्ष आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. प्रथम क्रमांकास रुपये दहा हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकास रुपये आठ हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकास सहा हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पारितोषिकांचे स्वरूप आहे. ‘गतीमान शिक्षणातून समाज परिवर्तन :डॉ. पतंगराव कदम’, ‘कोवीड १९ नंतरची जागतिक परिस्थिती’, ‘ राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० ‘, ‘ एकविसाव्या शतकातील सांस्कृतिक परिवर्तन’, ‘डिजिटायझेशनच्या युगाचे फायदे तोटे’, ‘ माझ्या दृष्टीकोणातून भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास ‘, ‘ तरुण आणि उद्योजकता ‘, ‘ भारतीय संविधान : लोकशाहीच्या यशाचे गुपीत ‘हे स्पर्धेचे विषय आहेत.
डॉ. जयंत ओक, डॉ. भारतभूषण सांख्ये, विवेक रणखांबे, डॉ. शरद जोशी परीक्षण करणार आहेत. या स्पर्धेसाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून त्यात डॉ हेमचंद्र पाडळीकर, डॉ प्रमोद पवार, डॉ सचिन आयरेकर, डॉ विजय फाळके, सुजाता मलिक, प्रतिमा गुंड यांचा समावेश आहे.