आमचा ८ रूपयात थाळी देण्याचा विचार होता : आठवले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/athavale-food.jpg)
काही दिवसांपूर्वीच शिवसनेने जाहीर केलेल्या वचननाम्यात १० रूपयांमध्ये थाळी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यानंतर भाजपाने ५ रूपयांमध्ये अटल थाळी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांची फिरकी घेतली आहे. शिवसेना आणि भाजपा यांची थाळी खाऊन आमची थाळी ठरवू असं वक्तव्य आठवले यांनी केलं.
शिवसेनेने १० रूपयात थाळी देण्याचं आश्वासन दिलं आहे. तर भाजपा ५ रूपयांमध्ये थाळी देणार आहे. आम्ही ८ रूपयांमध्ये थाळी देणार होतो. पंरतु आता या दोघांची थाळी खाऊन आम्ही आमची थाळी ठरवू, असं रामदास आठवले म्हणाले. विधानसभेला आम्हाला ८ जागांची अपेक्षा होती. परंतु त्या मिळाल्या नसून त्या बदल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली आहे. तसंच राज्यात कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाची मागणी केली असून ४ महामंडळंही हवी असल्याचं ते म्हणाले.२०१४ पेक्षा यंदाची निवडणूक सोपी आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार आणि ममता बॅनर्जी या सर्व नेत्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जी विधाने केली त्या विधानाचा जनतेच्या मनावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नव्हता. त्या निवडणुकीप्रमाणे राज्याच्या निवडणुकीतदेखील भाजपाविरोधातील वक्तव्यांचा कोणताही परिणाम होणार नसल्याचं आठवले म्हणाले. यावेळी आमच्या २३० ते २४० जागा निवडून येतील,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.