आगामी निवडणुकांत बॅलेट पेपरवरच मतदान घ्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/EVM-.jpg)
- इव्हीएम नकोच : कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही मागणी
पुणे – इव्हीएमबद्दल निर्माण झालेल्या अविश्वासामुळे 2019 लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या मशीन्सऐवजी बॅलेट पेपरच वापरावे, अशी मागणी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी केली आहे. शुक्रवारी पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली.
सर्वोच्च न्यायालयानेही सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या याचिकेवर भाष्य करताना इव्हीएमबाबत साशंकता व्यक्त केली होती. न्यायालयानेही “हे शेवटी यंत्रच आहे’ असा उल्लेख केला आहे. त्यामुळे इव्हीएम मशीनच्या विरोधात आवाज उठवणार असल्याचे या दोघांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या कर्नाटकातील निवडणुकांमध्येही काही ठिकाणी मतदान केलेल्या व्यक्तींच्या संख्येपेक्षा इव्हीएममधील मतदानाची मोजणी जास्त झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे इव्हीएमवर विश्वास ठेवणे शक्य नाही, असे या दोघांचे म्हणणे आहे.
केंद्रात, राज्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये वापरले जाणारे इव्हीएम वेगळे आहेत. ते सदोष आहेत, असा दावाही या दोघांनी केला आहे. यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे आणि कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे उपस्थित होते.
दरम्यान, या विषयावर डॉ. आंबेडकर चौक येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी कॉंग्रेसने सांगितले.