पुणे : खासदार डॉ. कोल्हेंची रस्त्यावर ‘स्टंटबाजी’; सभागृहात कोण बोलणार?
-
कांदा उत्पादक प्रश्नी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भूमिका
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार
पुणे । विशेष प्रतिनिधी
केंद्र शासनाने कांदाच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारले आहे. त्याविरोधात राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहे. याबाबत सभागृहात मुद्दा मांडण्याची आवश्यकता असताना खासदार डॉ. अमोल कोल्हे रस्त्यावर ‘स्टंटबाजी’ करीत आहेत. सभागृहात शेतकऱ्यांची बाजू कोण मांडणार? असा उपरोधिक टोला शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लगावला आहे.
दरम्यान, कांद्रा निर्यात शुल्काबाबत राज्यात ठिकठिकाणी आंदोलने उभारली जात आहेत. नाशिकमधील बाजार समित्या सलग दुसऱ्या दिवशीही बंद आहेत. पुणे येथील आळे फाटा येथे शेतकऱ्यांनी आंदोलन उभारले आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत केंद्र सरकारशी पाठपुरावा करणार आहोत. निश्चितपणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला.
केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 22, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका…
याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. ₹2410 प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल.