‘सहा महिन्यांनी मोठा राजकीय भूकंप होणार’; पंतप्रधान मोदींचं विधान चर्चेत
Narendra Modi | लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालसह इतर आठ राज्यांमधील एकूण ५७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा या मतदारसंघात भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेला संबोधित केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तुमचं एक मत देशाची दिशा बदलू शकतं. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल आणि त्यानंतर सहा महिन्यांनी देशात एक मोठा राजकीय भूकंप होईल. घराणेशाहीचं राजकारण घेऊन पुढे चाललेले अनेक पक्ष नष्ट होतील.
तृणमूल काँग्रेसने बंगालला विकासापासून वंचित ठेवलं आहे. लोकांनाही आता जाणीव झाली आहे की, पूर्ण ईमानदारीने देशाचा विकास कोणी करू शकत असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे मी बंगालमधील मतदारांना आवाहन करतो की तुम्ही तुमच्या राज्यात भाजपाला मजबूत करा, त्यानंतर भाजपा तुमची प्रत्येक अपेक्षा पूर्ण करेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
हेही वाचा – टी-२० विश्वचषक महासंग्राम वेळापत्रक जारी; जाणून घ्या टीम इंडियाच्या सामन्याबद्दलची माहिती
बंगालमधील तृणमूल सरकार काही ठराविक लोकांच्या तुष्टीकरणासाठी संविधानावर हल्ला करत आहे. आपल्या संविधानाने दलितांना आणि मागासवर्गीयांना आरक्षण दिलं आहे. मात्र बंगालमध्ये त्या आरक्षणावर दरोडा टाकण्यात आला आहे. दलित आणि मागासवर्गीयांचं आरक्षण लुटून ते मुसलमानांना दिलं आहे. बंगालमधील सरकारने मुसलमानांना खोटी ओबीसी जातप्रमाणपत्रं देऊन त्यांचा ओबीसीत समावेश केला आहे. तुष्टीकरणासाठी हे लोक कुठपर्यंत जाऊ शकतात त्याचा एकदा विचार करा. १ जून रोजी तुम्ही दिलेलं एक मत या राज्यावरील धोकादायक संकट टाळू शकतं, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.