“तुम्ही फक्त लोकांशी गद्दारी केली, निष्ठेच्या गोष्टी सांगूच नका”!
आढळरावांचा कोल्हेंना खोचक टोला
![“You just betrayed people, never mind loyalty”](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/कोल्हे-आढळराव-1-1-780x470.jpg)
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्यात आरोप प्रयत्यारोपांच्या चांगल्याच फैरी झडत असल्याचे दिसते. निष्ठेच्या व विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना पाच वर्षात स्वतःच्या कोल्हेमळा रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रश्न सोडवता आला नाही, त्यासाठी मी २५ कोटी रूपये मिळवून दिले. अशा शब्दात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी डॉ. कोल्हे यांना चांगलेच सुनावले. शिवाजी आढळराव पाटील आंबेगाब तालुक्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना कळंब येथे जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी करून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी आढळराव पाटील यांनी स्वतः केलेल्या कामांची यादी वाचून दाखवत डॉ. कोल्हे यांच्या निष्क्रिय कारकिर्दीवर जोरदार टीका केली.
पुढे बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, “मी पंधरा वर्षात काय केलं ? असं विरोधक विचारत आहेत. मी कमलजा देवीची शपथ घेऊन सांगतो की पुणे – नाशिक महामार्गावरील खेड ते सिन्नर हा रस्त्याची मागणी केली, त्याचा पाठपुरावा केला, त्यासाठी भांडलो आणि हा रस्ता व या रस्त्यावरील सर्व बायपास मंजूर करून आणला. भोसरीपासून आळेफाट्यापर्यंत व भीमाशंकरपासून इनामगाव प्रयत्न प्रत्येक गावात माझी कामे आहेत. पंधरा वर्षांत काय केलं हे सर्व जनतेला महिती आहे. तुम्ही कुठली कामे केली हे स्पष्टपने सांगा. साडेचार वर्षांनंतर निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आठवण झाली, त्यापूर्वी शेतकऱ्यांचे प्रश्न नव्हते का ? शेतकऱ्यांना अडचणी नव्हत्या का? तेव्हा तुम्ही कुठे होता? असा प्रश्न आढळराव पाटील यांनी उपस्थित केला.
लोकसभेत भाषणे केली म्हणजे सर्व समस्या सुटतात असे नाही. मतदार संघातील उपस्थिती कमी व लोकसभेतही उपस्थिती कमी, यावर प्रश्न विचारला तर म्हणायचं मी शेतकऱ्याचा पोरगा. तुम्ही संसदेत पाच वर्षांत २६ भाषणे केली तर मी शेवटच्या पाच वर्षांत ५३ भाषणे केली. तुमच्या निष्क्रियता बाबत प्रश्न विचारला तर तुम्ही कांदा, कांदा म्हणता. खेड सिन्नर रस्ता मंजूर केला व तो माझ्यामुळेच झाला. पुणे-नाशिक रेल्वेसाठी प्रयत्न केले. मंजुरी मिळवली, रेल्वे बाबत जेवढे काम केले आजही तो प्रकल्प त्याच स्थितीत आहे, पाच वर्षांत त्याला काहीच गती मिळाली नाही. चाकणच्या ट्रॅफिकवरुन माझ्यावर टीका केल्या, तुम्हाला त्यात काही करता आले नाही, चाकणची ट्रॅफिक आता डबल वाढली आहे.
मी एकनिष्ठ, अरे हो बाबा तू एकनिष्ठ, त्यासाठी तुला अजुन एखादा अवॉर्ड देऊ, पण लोकांच्या प्रश्नांचे व समस्यांचे काय ? तुम्हाला तुमच्या राहत्या कोल्हे मळ्याच्या रस्त्याचा प्रश्न सोडवता आला नाही, त्या रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी दिलाय. तुम्ही फक्त लोकांशी गद्दारी केली, त्यामुळे तुम्ही निष्ठेच्या गोष्टी सांगूच नका असा टोला आढळराव पाटील यांनी लगावला.