सत्तारांचा राजीनामा कुणीच का नाही मागितला? राष्ट्रवादीच्या आमदाराने उपस्थित केला प्रश्न…
![Why no one asked for Sattar's resignation? NCP MLA raised the question…](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Abdul-Sattar-1.jpg)
मुंबई : गायरान जमिनीच्या वाटपात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पदाचा दुरुपयोग केला, असा आरोप करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण त्यानंतर विरोधी पक्षांनी या मागणीबाबत आग्रही भूमिका घेतली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका आमदाराने याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत शंका उपस्थित केली आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि इतर यांनी जो अवैध भूखंड वाटला, त्याचप्रमाणे कृषी महोत्सवाच्या नावाखाली जी वसुली कृषीमंत्र्यांकडून झाली, त्याविरुद्ध राजीनाम्यची मागणी कालपासून तीव्र होणे अपेक्षित होते. सभागृहात कृषीमंत्री बसलेले असताना त्यांचा राजीनामा कुणीच का नाही मागितला?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
वाशिम जिल्ह्यातील गायरान जमिनीच्या वाटपात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पदाचा दुरुपयोग करून सर्व कायदेशीर बाबींचे उल्लंघन केले. याबाबत नागपूर खंडपीठाने गंभीर निरीक्षण नोंदवले. त्यांच्याविरोधात प्रथमदर्शनी सबळ पुरावेही उपलब्ध आहेत. जिल्हा कोर्टाचा आदेश माहिती असतानाही तत्कालीन महसूल राज्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला, असा आरोप अजित पवारांनी केला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
त्यानंतर काल, बुधवारी अब्दुल सत्तार यांनी याप्रकरणात निवेदन केले. गायरान जमीन हस्तांतर प्रकरणात अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत निवेदन करत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. मागासवर्गीय, आदिवासी सामाजाच्या लोकांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतला असून याप्रकरणात दिवााणी न्यायालयाचा निकाल अधिकाऱ्यांनी माझ्या निदर्शनास आणला नाही, असा खुलासा अब्दुल सत्तार यांनी केला. या प्रकरणात आपण कोणतेही नियमबाह्य काम केलेले नसून न्यायालय जी शिक्षा देईल ती आपण भोगायला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर विरोधकांनीही नरमाईची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.