आचारसंहिता म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर माहिती
![Code of conduct is enforced in the country, what happens if it is violated](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Loksabha-Election-780x470.jpg)
Loksabha Election 2024 | संपुर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. एकदा का निवडणूक जाहीर झाली की आचारसंहिता लागू होते. आचारसंहितेच्या अंतर्गत काही नियम ठरवले जातात आणि ते सर्व नियम हे संबंधित राजकीय पक्षांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान पाळावे लागतात. निवडणूक आचारसंहिता निवडणुकीच्या तारखेच्या घोषणेनंतर लगेच लागू होते आणि निवडणुका संपेपर्यंत सुरू राहते. तर आज जाणून घेऊयात आचारसंहितेसंदर्भात सविस्तर माहिती..
आचारसंहिता म्हणजे काय?
आचारसंहिता म्हणजे कोणत्याही व्यक्ती, गट किंवा संस्थेसाठी निर्धारित सामाजिक व्यवहार, नियम याला आचारसंहिता म्हटलं जातं. आचारसंहिता ही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर लागू होते. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय करावं आणि काय करु नये हे आखून दिलेली नियमावली. या नियमावलीला आदर्श आचारसंहिता असं म्हटलं जातं.
आदर्श आचारसंहितेचे नियम काय आहेत?
- मतदारांना पैसे वाटणे, महागड्या भेटवस्तू देणे, मतदारांना लालूच किंवा आमिष दाखवणे या सगळ्या गोष्टी करण्यास आचारसंहिता काळात सक्त मनाई असते. त्यामुळे या कालावधीत विद्यमान सरकारला कोणत्याही विकासकामांची घोषणा करता येत नाही.
हेही वाचा – थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक रस्त्याचे फूटपाथ ‘अर्बन स्ट्रीट डिझाईन’
- आचारसंहिता काळात कोणत्याही सत्ताधारी मंत्र्याला रस्ते, पाणी, वीज देऊ अशी आश्वासनं देता येत नाहीत. तसंच निवडणुकीवर परिणाम होणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची आपल्या आवडीच्या ठिकाणी बदली करता येत नाही.
- मतदारांना धमक्या देणं, दबाव आणणं हे आदर्श आचारसंहितेचा भंग करणारं ठरतं.
- आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय रॅली किंवा बैठक घेण्यासाठी पोलिसांची संमती आवश्यक असते.
- आचारसंहिता काळात विरोधकांचा पुतळा जाळणं, अशा प्रकारचा निषेध नोंदवणंही नियमांत बसत नाही.
आचारसंहितेचं उल्लंघन केल्यास काय कारवाई होते?
कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा राजकीय पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराने आदर्श आचारसंहिता पाळली नाही तर निवडणूक आयोगाकडून त्याच्यावर कारवाई केली जाते. संबंधित उमेदवाराला निवडणूक लढवण्यापासून रोखले जाऊ शकतं. आवश्यक असल्यास फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकतो आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.