“सरकार पाडण्याचा आमचा मानस नाही, त्यामुळे…”; संजय राऊतांचा उल्लेख करत आठवलेंचा टोला
!["We do not intend to overthrow the government, so"; Tola of Athavale mentioning Sanjay Raut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/ramdas-athawale-Raut.jpg)
मुंबई |
रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये महाविकास आघाडीवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महाविकास आघाडीवर टीका करता प्रशासनाचं मॅनेजमेंट करण्यापेक्षा महाविकास आगाडी एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त असल्याचा टोला आठवलेंनी लगावला. “हे सरकार प्रशासनाचं मॅनेजमेंट चांगलं करण्यापेक्षा एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त आहे. सरकारकडून विकास कामांबाबत योग्य आढावा घेतला जात नाही,” अशी टीका आठवले यांनी केली. प्रशासन मॅनेजमेंटपेक्षा महाविकास आघाडी एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर टीका केल्यानंतर सोमवारी पुन्हा आठवलेंनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं. महाविकास आघाडीवर टीका करताना रामदास आठवलेंनी, “हे सरकार मॅनेजमेंट चांगलं करण्यापेक्षा एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त आहेत. सरकारकडून विकास कामांबाबत योग्य आढावा घेतला जात नाही. सरकार पाडण्याचा आमचा मानस नाही, त्यामुळे संजय राऊत यांचे आरोप निरर्थक आहेत,” असं आठवले म्हणाले. “केंद्रीय यंत्रणांचा वापर चुकीचा होत नाही, मोदी सरकारला अशा छोट्या चौकशी करण्याची गरज नाही. केंद्र विकास आराखडा घेऊन पुढे जात आहे.आमचे सरकार मुद्दाम कोणाला त्रास देणार नाही,” असे म्हणत आठवलेंनी मोदी आणि भाजपची पाठराखण केली.
“राज्यात सध्या सुरू असलेले भांडण मिटलं पाहिजे असे आम्हाला वाटतं. उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा आणि संजय राऊत यांना समज द्यावी,” असा सल्लाही यावेळी आठवलेंनी दिला. तसेच, “शिवसेना-भाजपा एकत्र आले पाहिजे. दोन्ही काँग्रेस सोबत राहिल्यास शिवसेनेचे नुकसान होईल. जुन्या फार्मुल्यावर एक असल्यास भाजपा देखील तयार होईल,” असा पुनरुच्चार आठवलेंनी केलाय. “ठोस पुरावे नसताना आरोप करू नये, राणे यांच्या घरावर कारवाई करणारे अधिकारी इतके वर्ष झोपले होते का? सूडाची भूमिका असू नये. कंगना यांचे कार्यालय देखील तोडण्यात आले होते,” असंही आठवले म्हणाले. त्याचप्रमाणे, “आरोप शिवसेनेकडून होत आहेत त्याला भाजपा उत्तर देत आहेत,” असेही आठवले म्हणाले.