उद्धव ठाकरेंचं बळ ‘आम आदमी’मागे ः केजरीवाल संकटात, मुंबईत येऊन ठाकरे-पवारांची भेट, राज्यसभेत भाजपला घेरण्याची रणनिती…
![Uddhav Thackeray, strength behind 'Aam Aadmi', Kejriwal in crisis, Thackeray-Pawar meeting in Mumbai, Rajya Sabha, BJP,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Udhav-Thakre-Arving-Kejriwal-780x470.png)
मुंबई : दिल्लीतील कारभाराबाबतचा नवा वटहुकूम राज्यसभेत मंजूर होऊ नये, यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटणार असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी जाहीर केले. त्यानुसार केजरीवाल यांनी आज (बुधवारी) सकाळी उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे आपच्या शिष्टमंडळासह भेट घेतली तर गुरुवारी सकाळी ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
दिल्लीचे सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यात दिल्लीतील नोकरशाहीवर कोणाचे नियंत्रण असावे यावरुन बऱ्याच वर्षापासून वाद चालला होता. यावर गेल्या दोन आठवड्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने दिल्ली सरकारच्या बाजूने निकाल दिला. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीटी) सर्व नोकरशाहांवर दिल्ली सरकारचे नियंत्रण असेल, असे कोर्टाने म्हटले. तसेच पोलीस, जमीन आणि पब्लिक ऑर्डर हे तीन विभाग केंद्र सरकारच्या, पर्यायाने नायब राज्यपालांच्या अखत्यारीत येतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने विशेष वटहुकून काढत दिल्ली सरकारची पुन्हा कोंडी केली.
केजरीवाल संकटात, मुंबईत येऊन ठाकरे-पवारांची भेट!
केंद्राच्या या वटहुकूमाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सहा महिन्यांच्या आत त्यासंबंधीच्या विधेयकाला संसदेची मंजुरी आवश्यक आहे. त्यामुळे याबाबत पुढील लढाई राज्यसभेमध्ये होण्याची शक्यता आहे. हेच लक्षात घेऊन दिल्ली सरकारच्या अधिकारांबाबत केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात केजरीवाल विरोधी पक्षांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचा पाठिंबा मागत आहेत. राज्यसभेत भाजपचं बहुमत नसल्याने हा वटहुकूम मंजूर करण्यात भाजपला अडचणी येऊ शकतात. तत्पूर्वीच केजरीवाल यांनी विरोधी पक्षांची आघाडी उघडत भाजपविरोधी पक्षांना साद घातलीये.