उद्धव ठाकरेंचा राहुल नार्वेकरांना इशारा; म्हणाले, अध्यक्षांनी काही उलट-सुलट केलं तर..
![Uddhav Thackeray said that the President did some reverses](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/rahul-narvekar-and-uddhav-thackeray-780x470.jpg)
मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल काल सुप्रीम कर्टाने दिला. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कर्टोने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेणार असल्यामुळे, ते आमदार पात्रच आहेत यात काही शंका नाही. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना योग्य तो निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, काल न्यायालयाने त्यांच्यासमोर जो पोपट ठेवलाय, तो हलत नाही, डोळे उघडत नाही वगैरे सांगून तो मेलाय हे जाहीर करण्याचं काम फक्त विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलंय. विधानसभा अध्यक्ष आधी आमच्याकडे होते. आता भाजपात आहे. त्यांना राजकीय प्रवासाची माहिती आहे. तो प्रवास कायद्याच्या चौकटीत राहून कसा करायचा हे चांगलं कळतं. संपूर्ण जगात महाराष्ट्राची अवहेलना चालली आहे. महाराष्ट्राची बदनामी थांबली पाहिजे.
हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
काल जे घडलं, त्यावर अनेरजण त्यांच्या चष्म्यातून बघू शकतात. मेलेला पोपट हातात घेऊन मागून मिठूमिठू करणारी लोकं आहेत. तात्पुरतं जीवनदान मिळालं आहे. मला वाटतं की महाराष्ट्राची ही अवहेलना थांबवायला पाहिजे. माझ्याप्रमाणेच नैतिकतेला जागून या बेकायदेशीर सरकारने राजीनामा द्यायला हवा. न्यायालयाने सगळी लक्तरं वेशीला चांगल्यानंतर आपण सगळे निवडणुकीला सामोरे जाऊया. लोकशाहीत शेवटचं न्यायालय जनतेचं असतं. आपण जनतेच्या न्यायालयात जायला काय हरकत आहे? आपण जनतेचा कौल स्वीकारू, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अध्यक्ष त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतीलच. त्यांनी उलट-सुलट काही केलं तर ज्याप्रमाणे आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत, त्याचप्रमाणे जर इथे काही वेडंवाकडं झालं तर पुन्हा आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत. त्यानंतर जी काही बदनामी होईल, तेव्हा मात्र यांना जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाहीत. आज तर विधानसभा अध्यक्ष परदेशात आहेत. त्यांनी लवकरात लवकर यावं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे निर्णय घ्यावा, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्षांना इशारा दिला आहे.